

जालना : आता जालना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची बोगसगिरी चालणार नाही. बोगस डॉक्टरांच्या अघोरी इलाजामुळे अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. बंगाली बाबाच्या या अघोरी कृत्यावर टाच मारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. खाजगी रुग्णालयांच्या फलकांवर डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता व पॅथी स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य असल्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. याबैठकीत निर्देश देताना मिसाळ यांनी सांगितले की, सर्व खाजगी डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाच्या बोर्ड / पाटीवर एमबीबीएस, एमडी, एमएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीडीएस आदी पदव्या स्पष्टपणे नमूद कराव्यात. यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही व योग्य उपचाराची निवड करणे सोपे होईल.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले.
तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समित्यांमार्फत कारवाई करण्यात येणार असून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात बोगस डॉक्टरांविरोधात सक्त कायदेशीर कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
गतवर्षी 5 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
गतवर्षी आरोग्य विभागाने राबवलेल्या विशेष अभियानादरम्यान जिल्हाभरात 5 बोगस डॉक्ट आढळून आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 5 डॉक्टरांना नोटीस देऊन समज देण्यात आली आहे. येत्या काळात बोगसगिरीला चाप बसणार आहे, अशी अपेक्षा आहे.
फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल रुग्णालयांच्या फलकांवर शैक्षणिक अर्हता स्पष्ट केल्याने रुग्णांना योग्य डॉक्टर निवडणे सुलभ होणार असून बोगस डॉक्टरांच्या फसवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
रमेश मिसाळ, अप्पर जिल्हाधिकारी