

जालना जिल्ह्यातील अवैध व नियमबाह्य वाळू उपशावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जालन्याचे खा.डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अंबड तालुक्यातील मौजे बढाण खुर्द येथील नदीपात्रातील गट क्रमांक 102, 104, 105, 107 तसेच 109 ते 114 व 119 या गटांमधून शासनामार्फत लिलाव प्रक्रियेद्वारे वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदारास 3 हजार 604 ब्रास वाळू उपशाची परवानगी देण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, प्रत्यक्षात परवानगी दिलेल्या गटांव्यतिरिक्त इतर ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून प्राप्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे नदीपात्रातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून शासनाच्या महसुलालाही मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह बदलून परिसरातील गावांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यास कंत्राटदारांकडून दडपशाही केली जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. अवैध वाळूचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे.
कायदेशीर कारवाई
या पार्श्वभूमीवर, अवैध व नियमबाह्य वाळू उपशावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर कठोर कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी खा.कल्याण काळे यांनी निवेदनातून केली आहे.