

जाफराबाद ः तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्त नोंदणी प्रक्रियेत दलालांचा सुळसुळाट वाढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अधिकृत प्रक्रियेऐवजी दलालामार्फतच व्यवहार होत असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे आरोप होत आहेत.
कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना “आमच्यामार्फतच काम होईल” असा दबाव टाकत दलालांकडून अवाजवी पैसे उकळले जात असल्याची तक्रार आहे. काही दलाल स्वतःला कार्यालयाशी संबंधित असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचेही उघड झाले आहे. परिणामी, सरकारी प्रक्रिया पारदर्शक राहण्याऐवजी दलालांच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, तालुक्यातील काही मुद्रांक विक्रेत्यांकडूनही परवान्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. नियमांचे उल्लंघन करत प्रत्यक्ष विक्री न करता इतर व्यक्तींमार्फत जास्त दराने मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्प विक्री केली जात असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर “कार्यालयातील दलाल व गैरप्रकार तत्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व दस्त नोंदणी प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने केली जाते. नागरिकांनी कोणत्याही दलालामार्फत व्यवहार करू नये, तसेच थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आम्ही वेळोवेळी आवाहन करत असतो. दलालांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी गंभीर असून याची चौकशी करून दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
एस. एन. वाडेकर, सहायक दुय्यम निबंधक, जाफराबाद