

जालना : जालना शहरातील हमालपुरा भागात गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या शहर शाखा क्र.3 च्या अनागोदी काराभारामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे पाण्याच्या विद्युत मोटारी चालत नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अभियंता सचिन उकंडे यांना वारंवार तक्रार करूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
हमालपुरा भागात सुमारे शंभर ते सव्वाशे घरांची वस्ती आहे.या भागात महावितरणच्यावतीने होणारा विज पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने घरगुती उपकरणे चालत नाहीत. अभियंता सचिन उकंडे यांच्याकडे तक्रार करुनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
विशेषतः महापालिकेच्या नळाला पाणी आल्यावर पाण्याच्या मोटारी चालत नसल्याने नागरिकांना पाणी भरण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत मोटारी चालत नसल्याने पिण्यासाठी नागरीकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड वाढला आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी जुनी एमआयडीसी येथील शहर शाखा क्र.3 च्या कार्यालयात तक्रार नोंदवून अभियंता सचिन उकंडे यांच्यासमोर व्यथा मांडली. तक्रारीनंतर चार ते पाच दिवसांनी महावितरणचे कर्मचारी पाहणीसाठी आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे.
वीजपुरवठा तातडीने सुरळीत करा
महावितरणचे अभियंता सचिन उकंडे यांच्याकडून दोन दिवसांत वीजपुरवठा सुरुळीत होईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर प्रश्न न सुटल्याने नागरिकांमधे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. अभियंता सचिन उकंडे यांना दुरुस्तीचा ‘मुहूर्त’च मिळत नसल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.