

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.
सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असताना पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिके माना टाकू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोडखा बु. येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा पारंपरिक पद्धतीचा प्रयोग करण्यात आला आहे.
या प्रयोगासाठी ५ किलो गूळ, ३० किलो मीठ, रूट बोकर, पळसाचा ओला पाला आणि लाकूड आदी साहित्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत पर्जन्यवृष्टी व्हावी, या उद्देशाने स्थानिक पातळीवर हा प्रयोग करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, शास्त्रीयदृष्ट्या कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांची उपलब्धता, वातावरणातील आर्द्रता, तापमान, वाऱ्याचा वेग आणि इतर हवामानविषयक घटक अनुकूल असणे आवश्यक असते. त्यामुळे बोडखा बु. येथे करण्यात आलेल्या या पारंपरिक प्रयोगाचा प्रत्यक्ष परिणाम होतो का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पिकांची वाढ खुंटली
घनसावंगी तालुक्यात जून-जुलैमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन व कापूस पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पाण्याअभावी सुकू लागली आहेत. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.