

घनसावंगी ः तालुक्यातील घनसावंगी- बोडखा या मार्गावरील मांदळा, बोडखा, खडका, खालापुरी, पिपंरखेड आणि डोंगरवाडी या गावांना जोडणारा सुमारे 13 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. प्रशासनाचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
घनसावंगी-बोडखा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे निघून गेले आहे. परिणामी रस्ता खडीमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला असून चारचाकी वाहनांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि कामगारांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मात्र, खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल वेळेत बाजारात पोहोचविणे कठीण जात आहे. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आणखी वाईट होऊन चिखल व पाण्यामुळे प्रवास अधिकच धोकादायक बनतो.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व इतर सेवा वेळेत पोहोचण्यास अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या 13 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
डांबर उखडल्यामुळे रस्ता पूर्णपणे खडबडीत झाला आहे. रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहन चालवताना प्रचंड अडचणी येतात. रस्त्यावर उघडी पडलेली खडी इतकी धारदार आहे की टायर खराब होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रस्ता तातडीने दुरुस्त करावा.
पांडुरंग ढेरे, बोडखा
या रस्त्यावरून आम्हाला दररोज कामानिमित्त ये-जा करावी लागते. पण सध्या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की वाहन चालवताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे संतुलन बिघडते आणि कधी अपघात होईल याची भीती सतत वाटत राहते. रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा.
डिगांबर धबडकर, मांदळा