

आष्टी ः परतूर तालुक्यातील आष्टी गावासह परिसरात परतूर येथून जोडलेल्या मुख्य वाहिनीवर वारंवार बिघाड होत असल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ऐन उन्हाळ्यात तासोन तास वीज गुल होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
आष्टी येथे महावितरण चे 33 केव्ही उपकेंद्र असून या केंद्रावर जवळपास 22 गावांचा भार आहे. यासाठी परतूर येथील 132 केव्ही केन्द्रातून वीजपुरवठा करण्यासाठी स्वातंत्र्य विज वाहिनी जोडलेली आहे. मात्र ही वाहिनी जुनाट झाल्याने वाहिनीच्या वीज तार तुटणे, इन्सुलेटर फुटने, फ्यूज जळणे आदी तांत्रिक बिघाड मागील काही दिवसांपासून वाढले आहेत.
बिघाड शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना संपूर्ण 30 किलोमीटरची वाहिनी तपासावी लागत असल्याने फॉल्ट शोधण्यासाठी वेळ लागत आहे.यामुळे तासान्तास वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या सूर्य आग ओकत असल्याने उष्णतेची प्रचंड लाट निर्माण झाली आहे.वीज पुरवठा खंडीत होत असल्याने उकाड्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. यामुळे नागरीकांमधे संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान आष्टी परिसरात गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक विहीर व बोअरवेल तसेच या भागातून गेलेल्या डाव्या कालव्यात पाणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागायती शेती करून ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या खालोखाल केळीच्या बागाही आहेत. विहीर कालव्यात पाणी असतांना विजेअभावी ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. महावितरणने मुख्य वाहिनीची दुरुस्ती करून प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.
अडचणीत वाढ
आष्टी येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कोल्डड्रिंक विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांचे व्यवसाय अडचणीत आले असून त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.