

Freight trucks speeding through the city
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मालवाहतूक करणारे अवजड ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शहरातील दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या मार्गावरून सुरू असलेल्या या जड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जालना रेल्वे गुड्स शेडमध्ये सिमेंट, धान्य तसेच विविध प्रकारचा माल रेल्वेमार्गे दाखल होतो. हा माल ट्रकमध्ये भरून शहरातील तसेच परिसरातील व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये पोहोचविण्यात येतो. अवजड वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या वळण रस्त्याने गेल्यास अंतर अधिक पडत असल्याने आणि डिझेलचा खर्च वाढत असल्याने अनेक ट्रकचालक शहरातील मुख्य मार्गाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
अधिक फेऱ्या मारून जास्त उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने काही ट्रकचालक लक्कडकोट, विठ्ठल मंदिर, मस्तगड मार्गे रेल्वे स्टेशनकडे भरधाव वेगाने वाहतूक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात पादचारी, दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत भरधाव धावणाऱ्या ट्रकांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते साईनाथ चिन्नदोरे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यासनंतर सामाजिक कार्यकर्ते
गुरुवारी लक्कडकोट ते विठ्ठल मंदिर या रस्त्यावर चार ते पाच मालवाहतूक करणारे ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दंडात्मक कारवाई करा
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा सक्तीने वापर, प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची विशेष तपासणी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.