

Firing Case : पूर्ववैमनस्यातून गोळीबार; तरुण गंभीर जखमी, प्रकृती स्थिर
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रविवार, दि. ६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आतिष पाटोळे या तरुणावर जामवाडी शिवारात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत शिवराज भुरेवाल, मयुर मेघावले आणि सिद्धार्थ धारीवाल या तीन संशयितांची नावे समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ६ रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या अवघ्या एक ते दीड तासापूर्वी संशयित आरोपी आणि जखमी आतिष पाटोळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचे पर्यवसान नंतर गोळीबारात झाले. हल्लेखोरांनी झाडलेली एक गोळी आतिष पाटोळे यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी पाटोळे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, डॉक्टरांच्या वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. किरकोळ वादाव्यतिरिक्त यामागे काही जुने वैमनस्य आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.