

Farmers are suffering due to the collapse in the price of bitter gourd
पारध, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसांगवी परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदा कारल्याचा हंगाम चांगलाच कडू ठरला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्पादनातील घट, वाढता लागवड खर्च, पाण्याची टंचाई आणि बाजारभावातील घसरणीचा दुहेरी फटका बसला आहे. त्यामुळे एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कारले उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कारल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यासोबतच मिरची, टोमॅटो यांसारख्या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने पाण्याची मागणी वाढली. उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना कारल्याचे पीक वाचविण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली. परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.
पारध बु. येथील शेतकरी नारायण आल्हाट यांनी यंदा २० गुंठे क्षेत्रात कारल्याची लागवड केली. या लागवडीसाठी बियाणे, मल्चिंग, बांबू, तार, खते, औषध फवारणी, मजुरी तसेच पाण्यावर मोठा खर्च झाला. लागवडीसाठी 50 हजार रुपयांचे खर्च करावा लागला. मात्र, उत्पादन घटल्याने व कारल्याचा बाजारभाव पाच-सात रुपये किलोवर आले आहे.
बाजारभाव कोसळले
"एकीकडे उत्पादन खर्च वाढला, पाण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागले. दुसरीकडे रोगराईमुळे उत्पादन घटले आणि आता बाजारभावही कोसळला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काय उरणार?" असा सवाल कारले उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत.