

Ensure uninterrupted power supply during the festive season
जालना, पुढारी वृत्तसेवाः व्यापारी, उद्योजक, घरगुती ग्राहक नियमित विज बिल भरतात. तथापि सध्या महावितरण कडून कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा केला जातोय, तर अचानक वीज गायब होण्याचे प्रकारही वाढले आहेत. व्यापार, उद्योगासह घरगुती ग्राहकांना याचा फटका बसत असून सी.सी.टि.व्ही. फ्रिज, पंखे, टि.व्ही. संच आदी उपकरणे नादुरुस्त होऊन नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आगामी गणेशोत्सवासह सणांच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांची बुधवारी (दि.२) व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन सत्कार करत सविस्तर चर्चा केली.
यावेळी व्यापारी महासंघाचे महासचिव संजय दाड, कार्याध्यक्ष नगरसेवक अर्जुन गेही, दिलीप शाह, कोषाध्यक्ष विजय राठी, उद्योजक राजेश कामड, सरचिटणीस मनोज पाचफुले, उपाध्यक्ष विनोद कुमावत, दालमिल असोसिएशनचेअध्यक्ष अनिल पंच, सुदर्शन मुंबर, हुकूमचंद पाटणी, सुरेश वाभळे आदींची उपस्थिती होती.
गतवर्षी दुकानात वीज प्रवाह उतरुन एक विक्रेता आणि अन्य एकाचा मृत्यू झाला होता. अशी दुर्घटना पुन्हा ऊद्भवू नये यासाठी महावितरण आणि महानगरपालिका यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी देखील विनीत साहनी यांनी केली.