

Electricity issues in Jalna city and district MLA Arjunrao Khotkar meeting
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यातील वीज प्रश्नावर आक्रमक भुमीका घेत आ. अर्जुनराव खोतकर यांनी उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी बोर्डीकर यांनीही अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर) या मंगळवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता आ. अर्जुनराव खोतकर यांच्या विनंतीवरून त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विजेच्या प्रश्नावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी उपस्थित करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील विजेच्या समस्या संदर्भात आपण विधानसभा सभागृहात देखील प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतरही अधिकाऱ्यावर काहीच फरक पडत नाही. शहरातील वीज दिवसातून ५० वेळा जात असून याकडे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. यामुळे जनतेचा रोष लोकप्रतिनिधीला सहन करावा लागतो असेही खोतकर म्हणाले.
महावितरणचे करोडो रुपयांचे कामे होऊन देखील विजेची समस्या दूर झालेले नाही. यामध्ये अधिकारी व संबंधित एजन्सीची हात मिळवणी असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. सदर कामाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे कामे करताना लोकप्रतिनिधिंना विश्वासात न घेणे, कामाचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट असणे, आवश्यक ठिकाणी काम न करता काही ठराविक लोकप्रतिनिधीच्या मर्जीप्रमाणेच कामे करणे, अंदाज पत्रकाच्या बाहेरची कामे करणे, जुनीच कामे नव्याने दाखवणे, अशा गंभीर स्वरूपाचे प्रश्न आमदार खोतकर यांनी उपस्थित केले. प्रश्न न सुट्ल्यास सळो की पळो करु असा गर्भात इशारा खोतकर यांनी दिला.
वीज प्रश्न मार्गी लावा नसता परिणमाला सामोरे जा असा इशारा बैठकीत शिवसेना नेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे यांच्या उपस्थितीत महावितरणच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी आमदार नारायणराव कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू के पी, कार्यकारी अभियंता पेन्सलवार बैठकीस उपस्थित होते.