

आन्वा ः भोकरदन तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच ऐन गरजेच्या वेळी डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात पाच कंपन्यांचे एकूण 60 पेट्रोल पंप आहेत. बहुतांश पंपांवर डिझेल उपलब्ध नव्हते. ही टंचाई गेल्या चार-पाच दिवसांपासून आहे. शासनाच्या धरसोड वृत्तीच्या धोरणांमुळेच ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप नागरिक व शेतकऱ्यांमधून होत आहे.
भोकरदन तालुक्यातील पेट्रोलपंपावर असा शुकशुकाट पाहायला मिळाला. पाऊस कधीही येऊ शकतो, त्यामुळे कामे उरकणे गरजेचे आहे. पण, डिझेलअभावी ट्रॅक्टर गॅरेजमध्ये उभे ठेवावे लागत आहेत. युद्धकाळातही अशी टंचाई जाणवली नव्हती. शासनाने तात्काळ डिझेल न दिल्यास पेरणीचा हंगाम वाया जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहेत.
वाढलेला चाऱ्याचा खर्च आणि देखभालीमुळे शेतकऱ्यांना बैलजोड्या बाळगणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी बैलजोड्या विकून शेतीकामांसाठी ट्रॅक्टर व भाडेतत्त्वावरील आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुरू केला आहे. मात्र, आता डिझेलच मिळेनासे झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे.
मालवाहू आणि प्रवासी वाहने रस्त्याकडेला उभी करावी लागत असल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. प्रशासनाने तात्काळ पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेती मशागतीचे कामे खोळंबली
सध्या शेतात नांगरणी, वखरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी नियोजन करत आहेत; मात्र डिझेलअभावी ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.