

आन्वा ः भोकरदन तालुक्यातील दानापूर आणि परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. सध्या हे पीक चांगले बहरले असून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील मिरची, मका, कापूस व सोयाबीन ही पिके हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले होते.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील जुई धरण शंभर टक्के भरले. शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांची लागवड केली.
दानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कांदा पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक चांगले बहरले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.
योग्य नियोजन करून कांदा लागवड
मागील वर्षी सुरुवातीपासून कमी पाऊस झाल्यामुळे विहिरींना मुबलक पाणी साठा झाला नव्हता, परंतू ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या पाण्याचे योग्य नियोजन करून कांदा लागवड केली. सध्या कांदा चांगला बहरलेला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.