

Cotton producers are worried, buying up to Rs. 6,800
सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या नैसर्गिक संकटांसह बाजारातील धोरणांचे दुहेरी संकट कोसळले आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने वाचवलेल्या कापसावर आता त्यांची सारी भिस्त आहे. मात्र हाती आलेला कापूस खासगी व्यापारी अत्यंत बेभाव दराने खरेदी करत आहेत.
कापसातील ओलावा आणि कापसाची पत हे कारण सांगून खासगी व्यापाऱ्यांनी कापूस दर सहा हजार ८०० रुपये क्विंटल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पांढरे सोने अक्षरशः मातीमोल भावाने जात आहे. या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे तालुक्यातील बळीराजा पूर्णपणे हतबल झाला असून शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यावर्षी झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीन व कापसाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपातुन कसाबसा शिल्लक राहिलेला कापूस शेतकरी खासगी बाजारपेठेत विकायला आणत आहे. मात्र खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला अत्यंत कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह, दैनंदिन अर्थचक्र, मुलांचे शिक्षण तसेच बी-बियाणे तसेच लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत बळीराजा दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने कापूस केंद्र सुरू करून कापसाला हमी भाव देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पावसाने कपाशीचे नुकसान होऊन उत्पादन घटले आहे. कापसला भाव देण्याची मागणी होत आहे.
कर्ज कसे फेडावे
या कापसाला कमी भाव मिळत आहे. त्यातच मजूरही कापूस वेचणीसाठी प्रतिक्विंटल तब्बल बाराशे रुपये घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात एका क्वंटलचे केवळ पाच हजार रुपयेच पडत आहेत. परिणामी लागवड खते, बियाणे व इतर मेहनतीचा खर्च निघेला का, उधारीवर घेत-लेल्या खते बियाण्यांचे पैसे, कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिल आहे.