

Local institutions need strength : Ajit Pawar
परतुर, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे वळ आवश्यक असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
परतूर येथे नगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुरेशकुमार जेथलिया,. आ. सतीश चव्हाण, माजी आयुक्त मधुकरराजे आर्दड, अरविंद चव्हाण, बळीराम कडपे, नितीन जेथलिया, नगराध्यक्षा उमेदवार शांताबाई बाबुराव हिवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून भविष्यातील नेतृत्व घडते.
या संस्थांमध्येच स्थानिक कार्यकर्ता तयार होतो. माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात विलासराव देशमुख यांनी सरपंचपदापासून तर आर. आर. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यपदापासून राजकीय जिवनास सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थातून पुढे आलेले अनेक नेते राज्याच्या प्रमुख पदांपर्यंत पोहोचले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या दूरदृष्टीने ही व्यवस्था स्वीकारली. ही संस्थाच नेतृत्व घडवीते असे ते म्हणाले. "जेवायला पंगत बसल्यावर वाढणारा ओळखीचा असावा लागतो, तसा मी आता थेट वाढप्याच्या भूमिकेतून तुमच्याकडे आलो आहे. अर्थखाते माझ्याकडे आहे. निधीची कोणतीही अडचण येऊ देणार नाही.
सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहीती देतांना पवार म्हणाले की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला ३० हजार कोटी, त्यानंतर दिवाळीतील नुकसानीसाठी आणखी १० हजार कोटी रुपयांची वाढ करून ४० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाईचा निर्णय घेतला. हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून कृषी समृद्धी योजना आणल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भांडवल ७०० कोटींवरून १००० कोटी केले असून, अल्पसंख्याकांसाठी कर्जमर्यादा ५ लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
गरीब भूमिहीन नागरिकांना जागा आणि घर बांधण्यासाठी अर्थसाहाय्य देणाऱ्या ईडब्ल्यूएस योजनांचाही फायदा परतूरच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
विकास महत्त्वाचा
परतूरच्या गोदाकाठ परिसरातील उसाची शेती आणि साखर कारखान्याच्या विकासाचा उल्लेख करून, अजित पवार यांनी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला अर्थखात्याचे पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळावेत, तसेच शहरात वेडेवाकडे व्यवसाय होता कामा नयेत, यासाठी विकासाचे राजकारण महत्त्वाचे आहे असेही अजित पवार म्हणाले.