

परतूर: शेतकरी कष्टकरी तसेच सर्व सामान्य जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता.१२) परतूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा भव्य मोर्चा परतूर तालुकाध्यक्ष बालासाहेब आकात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
परतूर रेल्वेगेट पासून उप विभागीय कार्यालय परतूर येथे निघालेल्या या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर्ससहित हजारो शेतकरी, शेतमजूर, असंख्य महिला तसेच सर्व सामान्य नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफी विरोधात तसेच सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी शासनाने तत्काळ सर्व मागण्या मान्य करून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे शासनाला आवाहन करत काँग्रेस तालुका अध्यक्ष बालासाहेब आकात यांनी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी उपस्थितीत नेते व पदाधिकारी यांची भाषणे झाली. त्यांच्या भाषणातून सरकारवर प्रहार झाल्याचे दिसून आले. यावेळी मा. आ. राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, गोपाळ बोराडे, अविनाश चव्हाण, सारिका वरणकर, नीलकंठ वायाळ, शिवाजी महाराज भोसले, अंकुश तेलगड, विवेक घारे, संतोष दिंडे व इतर सहकारी उपस्थित होते.
या मागण्या
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अवकाळीची नुकसान भरपाई तातडीने द्या, निम्न दुधना प्रकल्पामध्ये चुकीचे सर्वेक्षण करून संपादित केलेल्या सुपीक जमिनीवरील सोलार प्रकल्प तत्काळ रद्द करण्यात यावा. नीट परीक्षा पेपर फुटीतील दोषींवर तत्काळ कारवाई करावी. पेट्रोल व डिझेल दरवाढ मागे घ्यावी तसेच घरगुती गॅस सिंलिडरचे वाढलेले दर कमी करावेत.