

Caterpillar infestation on soybean crops in the Pimpalgaon Renukai area
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे परिसरातील सोयाबीन पिकावर उंट अळी आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना दिसत आहेत.
या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस न झाल्याने सोयाबीन पीक जोमात आले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची पाने अळीने खाल्ल्याने पिकांची पाने विरळ झाली आहेत.
वेळेत नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधाची फवारणी करावी, असे आवाहन केले आहे.
पावसाअभावी पीक परिस्थिती चिंताजनक
पिंपळगाव रेणुकाई परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने पीक परिस्थिती चिंताजनक असतानाच दुसरीकडे सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.