

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. वनविभागाने देखील या भागात बिबट्या असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. सध्या उन्हाळी मिरची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची पिकाची लागवड करीत आहे. या मिरची लागवडीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मिरचीला नियमित पाण्याची गरज असते. मात्र कृषिपंपांसाठी महावितरणकडून रात्रीच्या वेळीच वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्याकरिता शेतकऱ्यांना अपरात्री शेतात जावे लागते. बिबट्याच्या भीतीमुळे जीव मुठीत धरून शेतात जावे लागत असल्याने शेतकरी कुटुंबे दहशतीखाली आहेत.पिपळगाव रेणुकाई शिवारात रात्री 2 वाजता बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.
आम्ही जीव धोक्यात घालून शेती कशी करायची?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे, पण जीव महत्त्वाचा आहे. समस्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे दिवसा किमान 8 तास अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी दिवसा वीज द्यावी,” अशी सामूहिक विनंती करण्यात आली असून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दखल घ्यावी- सध्या पिंपळगाव रेणुकाई मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करीत असतात परंतु मिरची भिजवण्यासाठी रात्री अप रात्री शेतकऱ्यांना मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर जावे लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करावा.
कृष्णा बेराड, शेतकरी