

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात शेतातील विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत शेतकऱ्यांचे दोन ठिबक सिंचन आणि अर्धा एकरावरील मका पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे गावातील शेतकरी नितीन दामोदर इंगळे व विक्रम किसन जाधव यांच्या शेतात ही दुर्घटना घडली. दुपारी 12 च्या सुमारास शेतातून गेलेल्या केव्ही विद्युत वाहिनीच्या दोन तारा वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटल्या. त्यातून निघालेल्या ठिणग्या सुकलेल्या मका पिकावर पडल्या आणि आगीने पेट घेतला.
आगीची तीव्रता इतकी होती की, शेतातील ठिबकच्या लॅटरल नळ्या वितळून गेल्या घटनेची माहिती मिळताच शेजारी असलेले शेतकऱ्यांनी धाव घेऊन पाणी व माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत अर्धा एकर मका व दोन्ही ठिबक जळून अंदाजे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेमुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शेतातून गेलेल्या तारा अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मोठे नुकसान- विजेच्या शॉर्टसर्किटमुळे माझ्या शेतातील मका पिकाला आग लागली. यामध्ये अर्धा एकर क्षेत्रातील मका पूर्णपणे जळून खाक झाली असून, माझे सुमारे 40 ते 50 हजारांचे नुकसान झाले आहे. माझ्या शेताशेजारील विक्रम जाधव यांची दोन एकर ऊस लागवडही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी.
नितीन इंगळे, बाधित शेतकरी