

जालना : बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी उपोषणकर्ते एकनाथ चव्हाण यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर चव्हाण यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
बंजारा समाज बांधव आणि उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांच्या हस्ते पाणी घेऊन एकनाथ चव्हाण यांनी आपले आमरण उपोषण सोडले. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव आणि आंदोलक उपस्थित होते.बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, तसेच आदिवासी समाजाला लागू असलेल्या सर्व शासकीय सवलती बंजारा समाजालाही लागू कराव्यात, या मागणीसाठी एकनाथ चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी उपोषणकर्ते एकनाथ चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधला. सोमवारनंतर मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन बंजारा समाजाच्या मागण्यांवर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी बंजारा समाज बांधव उपस्थितीत होते.
शब्दांचा आदर
उपोषण स्थगित केल्यानंतर बोलताना एकनाथ चव्हाण यांनी सांगितले की, पंकजाताई मुंडे यांच्या शब्दांचा आम्ही आदर करीत असून, त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आमरण उपोषण स्थगित करीत आहोत.