

बदनापूर : हिवाळ्याची चाहूल ओसरत असताना बदनापूर शहर व परिसरात उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. सकाळपासूनच तापमानात वाढ जाणवत असून दुपारच्या वेळेत उकाड्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे.
या वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत. परिणामी शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी जागोजागी रसवंती गृहे उभी राहताना दिसत आहेत.
उन्हाळा सुरू होताच रस्त्याच्या कडेला सुरू होणाऱ्या रसवंती गृहांतील घुंगरांचा मधुर आवाज नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. हा आवाज ऐकताच पादचारी, वाहनचालक आणि प्रवासी आपोआप थंडगार उसाचा रस पिण्यासाठी थांबत असल्याचे चित्र दिसते.
मशीनमधून ताज्या उसाचा रस काढताना येणारा सुगंध आणि बर्फ टाकून दिला जाणारा गार रस उन्हामुळे त्रस्त झालेल्यांना त्वरित दिलासा देतो. उसाचा रस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तो शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतो, ऊर्जा प्रदान करतो तसेच उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे लहान मुले, तरुण, कामगार, शेतकरी तसेच वयोवृद्ध नागरिकही मोठ्या आवडीने उसाचा रस सेवन करताना दिसतात. काही ठिकाणी लिंबू, आले किंवा पुदिन्याची चव देऊन रस अधिक चविष्ट बनवला जात आहे.
रसाचा दर सर्वसामान्यांना परवडणारा असून साध-ारणपणे १०, १५ ते २० रुपयांपर्यंत एक ग्लास उपलब्ध आहे. त्यामुळे कमी खर्चात ताजेतवानेपणा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रसवंती गृहांकडे वळत आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रसवंती व्यवसाय करणाऱ्यांना चांगली मागणी निर्माण झाली आहे. अनेकांनी हंगामी स्वरूपात हा व्यवसाय सुरू करून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. उष्णतेमुळे येत्या काही दिवसांत या व्यवसायाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
आम्ही शक्य तितकी स्वच्छता राखून ताजा रस देण्याचा प्रयत्न करतो. बर्फ, पिण्याचे पाणी आणि ग्लास स्वच्छ ठेवण्याकडे विशेष लक्ष देतो. आम्ही एका ग्लासाचा दर १० रुपये ठेवला असून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल याची काळजी घेतो. रोजंदारीवर काम करणारे मजूर, विद्यार्थी, प्रवासी तसेच वयोवृद्ध नागरिक नियमितपणे रस पिण्यासाठी आमच्याकडे येतात. उन्हाळ्यात मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा खर्च भागवण्यास मोठी मदत होते.
हरिदास घिसारे, रसवंती चालक