

Jalna crime news
पारध : सागर देशमुख
भोकरदन तालुक्यातील आण्वा येथे खदानीत पोहण्याच्या कारणावरून सोमवारी (दि.११) दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील प्रत्येकी पाच अशा एकूण दहा जणांविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रत्येकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज मस्तान कुरेशी (रा. आण्वा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आण्वा-वाकडी रस्त्यावरील खदानीत पोहत असताना विष्णू साळवे, सोन्या वडगावकर, करण कोळी व इतर दोघे हे प्राणघातक शस्त्रे घेऊन तेथे आले.
खदानीत पोहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून विष्णू साळवे याने शहबाज कुरेशी याच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मागे सरकल्याने दगड पायाच्या पंजावर लागून तो जखमी झाला. तसेच विष्णू साळवे याने बंदूक डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी इतर आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण व धक्काबुक्की केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून विष्णू साळवे, सोन्या वडगावकर, रितेश कोळी, करण कोळी व नीलेश धोबी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विष्णू दशरथ साळवे (रा. आण्वा) याने दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी मोटारसायकलने घरी जात असताना बौद्धवस्तीजवळ शहबाज कुरेशी, रफिक कुरेशी, मस्तान कुरेशी व इतर दोघांनी त्यांना अडवले. “आमच्या मुलांना खदानीत का पोहू दिले नाही,” या कारणावरून रफिक कुरेशी याने काठीने मारहाण केली. तसेच मस्तान कुरेशी याने लोखंडी रॉडने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हाताला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी पारध पोलिसांनी दोन्ही गटातील प्रत्येकी तीन अशा सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करत आहे.