जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे कोंडीराम गंगाधर निकम यांनी काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शनिवार (५) रोजी निदर्शनास आली. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ जळगाव येथील कोंडीराम गंगाधर निकम यांना श्री विठ्ठल संस्थानची जळगांव येथे गट क्रं. ११८ मधे १२ हेक्टर शेत जमीनपैकी सात एकर शेती ते सात वर्षापासुन सुमारे सहा हजार रुपयेप्रमाणे ठोक्याने करतात. यावर्षी त्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती व ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत पुर्ण पाच एक्कर सोयाबीनची काढणी त्यांनी केली. सोयाबीनची गंजी लावुन ताडपत्रीने ती झाकून ठेवली होती.
शनिवारी सकाळी ६ वाजता ते आणि त्यांच्या घरातील सदस्य शेतातमध्ये राहीलेली सोयाबीन काढणी करण्यासाठी गेले असता, झाकुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागलेली दिसली. त्यात सोयाबीन जळून राख झाली होती. अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने सोयाबीनच्या गंजीला आग लावून चाळीस ते पन्नास क्वींटल सोयाबीनचे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार कोंडीराम निकम यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.