

Ambad-Pathri highway: U-turn near Machhindranath Chinchoji; accident traps
अविनाश घोगरे
घनसावंगी: अंबड ते पाथरी या राज्य महामार्गावर तसेच घनसावंगी ते मच्छिंद्रनाथ चिंचोली दरम्यान अस-लेले तीन यू-टर्न सध्या परिसरातील नागरिकांसाठी प्रचंड धोक्याचे ठरत आहे. या ठिकाणी अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत या -ठिकाणी शेकडो लहान-मोठे अपघात झाले आहेत. दर दोन ते तीन दिवसांत एखादा अपघात होणे हे येथे नित्याचे बनले आहे. परिणामी हा संपूर्ण भाग 'अपघातप्रवण क्षेत्र' म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
दरम्यान, घनसावंगी शहराच्या पुढील बाजूस तसेच मच्छिंद्रनाथ चिंचोली गावाच्या जवळ असलेले हे तीन यू-टर्न रस्त्याच्या मधोमध व अचानक वळणावर असल्यामुळे वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. या ठिकाणी ना योग्य दिशादर्शक फलक आहेत, ना पूर्वसूचना देणारे चेतावणी फलक. त्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांना अचानक वळणाचा अंदाज येत नाही आणि वाहनांवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघातांची संख्या अधिक वाढते.
या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवणे, ठळक व स्पष्ट दिशादर्शक तसेच अपघातसूचक फलक उभारणे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स (बॅरी कोट्स) बसविणे अत्यावश्यक आहे. तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार व संतप्त मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
टोलनाका नसल्याने या मार्गाचा वापर
सध्या या महामार्गावरून पैठण, अंबड, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, आष्टी, पाथरी मार्गे परभणी व नांदेडकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मार्गावर एकही टोल नाका नसल्यामुळे अवजड वाहने या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यातच सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्यामुळे उसाचे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर जड वाहने यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या सर्व बाबींचा थेट परिणाम अपघातांच्या वाढत्या संख्येवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.