

वडीगोद्री ः अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव व बळेगाव वाळू घाटातून क्षमतेपेक्षा जास्त उपसा व मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केल्याची बाब समोर आली आहे. ईटीएस मोजणीचा अहवाल येईपर्यंत दोनही वाळू घाट बंद करण्याचे आदेश अंबड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहे.
अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील वाळू घाट क्रमांक 1 बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने ही कारवाई केली आहे. वाळू घाटावर केवळ मजुरांच्या सहाय्याने काम करणे अपेक्षित असताना, तिथे डोजर आणि मशिनचा वापर केल्याचे दिसून आले आहे. तपासणी दरम्यान मशिन फिरल्याच्या खुणा जागेवर आढळल्या असून, डोजरच्या साहाय्याने सुमारे 25 फूट उंचीचे रेतीचे मोठे ढिगारे (अंदाजे 50 ब्रास क्षमता) तयार करण्यात आले होते.
याच बरोबर उत्खनन नोंदणीत मोठी तफावत आढळून आली असून या मध्ये ईटीपी () रजिस्टरच्या नोंदीनुसार 18 एप्रिल रोजी केवळ 3,544 ब्रास वाळू उपसा झाल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेची पाहणी आणि नजरी आकलन केले असता, हा उपसा दाखविण्यात आल्यापेक्षा जास्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वास्तविक उपसाची कोणतीही अचूक नोंद टेंडर धारकाकडून ठेवली जात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.सदर प्रकरणात मोजणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे असे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.
या तपासणीत जालना जिल्ह्याच्या हद्दीतील वाळू बीड जिल्ह्यातील घाटधारकांनी बेकायदेशीरपणे पळवल्याचे तसेच घाटावर यंत्रांचा नियमबाह्य वापर होत असल्याचे अत्यंत गंभीर प्रकार समोर आले आहेत. तपासणीतील मुख्य निष्कर्ष आणि गंभीर बाब मध्ये जिल्हा हद्दीचे उल्लंघन व वाळू चोरी बीड जिल्ह्यातील वाळू घाटधारकांनी जालना जिल्ह्याच्या हद्दीतील साष्ट पिंपळगाव शिवारातून चक्क केनीच्या (दोरीच्या) सहाय्याने अवैध आणि विनापरवाना वाळू उपसा करून ती बीड जिल्ह्यामध्ये ओढून नेल्याचे निदर्शनास आले आहे.
जालना जिल्ह्याची वाळू अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने पळवल्याबद्दल संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्वच वाळू घाटांची ईटीएस ( ) मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि महसूल विभागाचे संयुक्त पथक ही मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करेल. स्थानिक पथकाचा अहवाल आणि ईटीएस मोजणीचा अहवाल प्राप्त होताच, संबंधित दोषींना नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेतला जाईल आणि त्यानंतर खुलासा समाधानकारक नसल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बीड जिल्हा प्रशासनास याबाबत अधिकृत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, घाटावर स्थिर पथक, पोलीस बंदोबस्त आणि आरटीओ विभागाचे कर्मचारी तैनात करण्याबाबत लेखी पत्रे देण्यात आली आहेत.बळेगाव व साष्ट पिंपळगाव येथील घाट क्रमांक 1 मोजणी अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रशासकीय उपाययोजना म्हणून तात्पुरते बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
स्थिर पथक स्थापन
रेती वाहतूक करणारी वाहने व तपासण्याकरिता स्थिर पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच सदर पथकात पोलीस, विभाग तसेच पोलीस पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे. विनक्रमांक व ओव्हरलोड वाहने तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी याकरिता पोलीस विभाग व विभाग यांना त्यांची पथके स्थापन करण्यात यावी. यासाठी यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचे स्मरणपत्र ही देण्यात आले आहे.
साष्ट पिंपळगाव घाटावरील नियमबाह्य उत्खननाचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून प्राप्त झाले आहेत. कोणत्याही घाटधारकाने अटींचे उल्लंघन केल्यास त्यांची गय केली जाणार नाही.
विजय चव्हाण तहसीलदार, अंबड