

शहापूर : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील शेतकरी दत्तात्रय बबनराव ढेरे यांनी मोसंबी पिकाला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे आपल्या शेतातील दोन एकर क्षेत्रावरील आठ वर्षे जुनी ३५० मोसंबीच्या झाडावरती जेसीबी फिरवून मोसंबीची झाडे नष्ट केली आहेत.
आठ वर्षांपूर्वी दत्तात्रय बबनराव ढेरे यांनी पिठोरी सिरसगाव शिवारात गट क्रमांक १७७ मध्ये मोठ्या अपेक्षेने दोन एकर क्षेत्रावरती मोसंबीची लागवड केली होती. मात्र आठ वर्षे सतत पाणी, खत, ठिबक सिंचन,औषधावर लाखो रुपये खर्च करूनही बाजारात मोसंबीला केवळ १५ ते १७ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
या दरात शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला उत्पादन खर्चही निघने कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अंबड तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. तालुक्यात दुष्काळ जन्य परीस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी संरक्षित पाणी साठ्यावरती कसेबसे पिक जागवली आहेत. परंतु बाजारात मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
एकीकडे रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या किंमती मध्ये मोठी वाढ झाल्याने व शेतकऱ्यांला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघने कठीण झाले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवरती आठ वर्षांची मोसंबीची झाडे काढण्याची नामुष्की ओढवली आहे.
जालन्यातील मोसंबीला २०१६ साली जीआय मानांकन मिळाले आहे. परंतु मोसंबीला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे मोसंबी पिकाला जीआय मानांकन मिळून काय फायदा ? असा प्रश्न शेतकऱ्यां समोर निर्माण झाला आहे.
उमेश पाष्टे, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना