

A 51 feet Bharat Mata temple will be constructed in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा महान संत डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून जालना शहराजवळील नंदापूर येथे तब्बल ५१ फूट उंचीचे भारत मातेचे मंदिर साकारले जात आहे. हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक आदर्श ठरणार आहे. सुरत (गुजरात) येथील भव्य भारत माता मंदिरानंतर नंदापूरचे हे मंदिर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे भव्य भारत माता मंदिर ठरणार आहे.
हे मंदिर केवळ एक धार्मिक केंद्र नसून, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक त्याचबरोबर या ठिकाणी राबविले जाणारे विविध उपक्रम निराधारांना आधार, निराश्रीत विद्यार्थ्यांना आश्रय, तणावमुक्ती व रोजगाराभिमुख दृष्टिकोन असणारे ठरणार आहे.
येथे कोणतीही जात, धर्म, पंथ, प्रांत भिंत ठरणार नसून, भारत माता ही सर्वांची आई या भावनेने सर्वांना एका धाग्यात बांधून राष्ट्रभक्ती आणि विश्वबंधुत्वाची संस्कृती रुजवली जाणार असल्याने हे मंदिर एकता, भारतमातेप्रती श्रद्धा आणि संस्कृती संस्कृतीचे प्रतीक त्याचबरोबर देशातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ ठरणार आहे. नंदापूर येथील समृद्धी महामार्गाच्या बाजूला साकारात असलेले ५१ फूट उंचीचे मंदिर ६ किलोमीटर अंतरावरून दिसणार, एवढी या मंदिराची उंची राहील.
भगवान बाबांनी भारत माता मंदिर उभारण्याचा संकल्प केल्यानंतर नंदापूरचे सामान्य आणि जेमतेम आर्थिक परिस्थिती अस लेले शेतकरी जनार्दन पुंजाराम उबाळे यांनी त्यांच्याकडील सात एकरपैकी १ एकर शेती मंदिरासाठी दान दिली. प्रसिद्ध मंदिरशास्त्र अभ्यासक अभियंते चंद्रप्रकाश शर्मा, भूषण देशमुख, एस.एन. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ महिन्यांपूर्वी मंदिराच्या कामाला सुरुवात झाली असून यासाठी दिलीपराव काळे, विष्णुपंत बुजाडे, गणेश सुपारकर, राजू सतकर, कल्याणराव देशपांडे, डॉ. सुभाष भाले, आदी प्रमुख कार्यकर्ते या कार्यात पूर्ण वेळ सेवा देत आहेत. जनतेच्या यथाशक्ती आर्थिक योगदानातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे. सध्या पहिला स्लॅब पडला आहे.
प्रत्येकी दहा फूट उंच याप्रमाणे ३० फुटांचे पायथ्याचे तीन टप्प्यांतील काम झाल्यानंतर भारत मातेची भव्यमूर्ती विराजमान केली जाणार आहे. ही मूर्ती बंदिस्त गाभाऱ्यात नसल्याने किमान सहा किलोमीटर अंतरावरूनही सर्वांना दर्शनाचा लाभ होणार आहे. नवीन तंत्रज्ञान व पारंपरिक शैलीचा अनोखा संगम असलेल्या मंदिराचा कळस दक्षिण भारतातील मंदिर शैलीप्रमाणे राहणार असून, मंदिरात भारत माता मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सरसंघचालकांना निमंत्रित करण्यात येणार असून, त्यासाठी भगवान बाबांचे प्रयत्न सुरू आहेत.
या मंदिराची उभारणी तीन मजली आहे. खालील दोन मजल्यांमध्ये चिंतनासाठी हॉल, त्यातदेखील आणखी एक भारत मातेची मूर्ती राहील. उर्वरित जागेमध्ये दहा बाय दहा आकाराच्या दहा खोल्या असतील. तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या हतात्म्यांचा इतिहास माहिती व्हावा, प्रेरणा मिळावी यासाठी स्थायी स्वरूपात क्रांतिकारकांची चित्रमय प्रदर्शनी राहणार आहे. भगवान बाबा यांची कुटी, अत्यंत पवित्र वातावरणात साधना करता यावी, यासाठी सिद्धसाधक आश्रम राहणार असून तेथे निशुल्क व्यवस्था केली जाणार आहे.