

84% of sowing at risk in Mantha Taluka
बालाजी कुलकर्णी
मंठा : मंठा तालुक्यातील ६५ हजार ८३८ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५५ हजार ५५८ हेक्टरवर म्हणजेच ८४ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसह सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची पेरणी घाईघाईने केली. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली मात्र कोवळी पिके उगवून आल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली असून दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे कोवळी पिके माना टाकू लागल्याने पाऊस लवकर न परतल्यास खरिपाची पेरणी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
तालुक्यात मृग नक्षत्र पावसाअभावी कोरडे गेले होते. त्यानंतर आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीस समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, आता खरिपाची पिके उगवली असून आता त्यांना पाण्याची गरज असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचा लहरीपणा खरिपाच्या पिकांना धोकादायक ठरत आहे. मागील वर्षी निसर्गाच्या अवकृपेने व लहरीपणामुळे पीक उत्पादन कमी झाले होते.
त्यानंतर बाजारपेठेत सुरुवातीला शेतीमालास भावही कमी मिळाला असला तरी शासनाने हमीभावाने सोयाबीन व कापसाचे खरेदी केल्याने शेतकऱ्याना तोटा झाला नाही. नंतर खुल्या बाजारपेठेत शेतीमालाचे भाव वाढल्याने शेतकरी चिंतामुक्त होता. मात्र चालू वर्षात पावसाने उशिराने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या व लागवडी विलंबाने झाल्या. त्यात उगवण झाली, तर पावसाने पाठ फिरविली.
यामुळे खरीप पीक संकटात सापडले आहे. तालुक्यात पाऊस उशिरा झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या. काही भागांत दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकाची पेरणी व कपाशीची लागवड घाईघाईने केली.
परंतु आता पावसाने दडी दिल्याने उगवण होत असलेल्या पिकास धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील काही भागांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. महागामोलाचे बियाणे व मेहनत वाया जाऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी उर्वरित पेरणी थांबवलेली आहे.