![Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी डेडलाईन २४ ला संपणार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2F4-14.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जालना; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन 24 तारखेला संपत आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे शनिवारी महासंवाद मेळावा होत असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी 29 ऑगस्ट रोजी शहागड येथे आंदोलन करण्यात आल्यानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले होते. या उपोषणावर एक सप्टेंबर रोजी पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्यानंतर तीव्र पडसाद उमटले. अनेक नेत्यांनी मध्यस्थी करूनही जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. अखेरीस 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्री अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी जरांगे यांच्याकडे महिनाभराची मुदत मागितली होती. जरांगे यांनी त्यात आणखी दहा दिवसांची भर टाकून 40 दिवसांपर्यंत आरक्षणाचा विषय निकाली काढण्याचे आवाहन केले होते.
शनिवारी होणार्या महासंवाद मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी 123 गावांतील लोकवर्गणी गोळा झाली आहे. सभेसाठी 100 एकर जागेचे नियोजन केले होते. परंतु, जागा अपुरी पडायला नको म्हणून पुन्हा जागा वाढवली आहे. तसेच सभास्थळाला जोडणार्या सर्व मार्गांवर विविध संघटनांनी चहा, पाणी, नाश्ता, पाणी, फळांची व्यवस्था उत्स्फूर्तपणे केली आहे. बीड, जालना जिल्ह्यातील दोनशे डॉक्टर्स सभास्थळी राहणार आहेत.