

वसमत; पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.४) पहाटे नांदेड जिल्ह्यातील आलेगावजवळ घडली. हे सर्व मजूर वसमत तालुक्यातील गुंज येथील आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गावापासून काही अंतरावर २० ते २५ कुटुंबियांची वस्ती आहे. या वस्तीवरील सर्व जण मजुरीची कामे करतात. दुपारपर्यंत ७ महिलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. (Nanded Accident)
आज सकाळी हे मजूर ट्रॅक्टरने हळद काढण्यासाठी जात होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तीन तासांपासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. साधारणत: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मदतकार्य सुरु झाले. विहिरीत भरपूर पाणी आणि गाळ असल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला. सौर ऊर्जेचा विद्युत पंप आणि जनरेटवरील मोटारचा वापर करुन विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे. आमदार राजू नवघरे यांच्यासह गावातील अनेक महिला - पुरुषांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत ताराबाई जाधव (वय ३५), धुरपता जाधव (वय १८), सरस्वती गुरड (वय २५), सिमरन कांबळे (वय १८), चौतराबाई पारधे (वय ४५), ज्योती सरोदे (वय ३५), सपना राऊत (वय २५) या सात जणींचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला आहे. तर जखमी पुरभाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाचविण्यात यश आले.