

Teams of officials deployed to prevent linking
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात बियाणे व खतांचे लिंकींग रोखण्यासाठी पाच तालुक्यांसाठी दहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कृषी केंद्रावर जाऊन शाहनिशा केली जाणारआहे.
तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सांगितले. जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. यावर्षी सुमारे ३.८० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. तसेच कृषी विभागानेही बैठका घेऊन खतासोबत इतर कोणत्याही उत्पादनांची किंवा निविष्ठांची सक्तीने विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
विक्रेत्यांकडून बळजबरीने इतर उत्पादने देण्याचा प्रयत्न होत असल्यास शेतकऱ्यांनी त्यास नकार द्यावा. कृषी निविष्ठांची लिंकींग होत असल्यास तातडीने तक्रार करावी असे आवाहन कच्छवे यांनी केले आहे. दरम्यान, सध्या खते बियाणांची खरेदी सुरु झाली असून त्यासाठी कृषी विभागाने गुणनियंत्रण विभाग सज्ज केला आहे. लिंकींग बाबत शेतकऱ्यांना तक्रारी करणे सोईचे व्हावे यासाठी पाच तालुक्यांमधून १० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
यांची केली नियुक्ती
हिंगोली तालुक्यासाठी कृषी अधिकारी प्रवीण मनवर, पंकज राठोड यांची नियुक्ती केली आहे. कळमनुरी तालुक्यासाठी समीर वाळके, रामेश्वर गवळी, वसमत तालुक्यासाठी केशव भुक्तरे, रामेश्वर गवळी. सेनगाव तालुक्यासाठी देवेंद्र देशमुख, पंकज राठोड. औंढा नागनाथ तालुक्यासाठी किशोर शेळके व सुभाष पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.