

बीड ः खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले. बियाण्यांची जादा दराने विक्री किंवा लिंकिंग पद्धतीने विक्री होणार नाही, याबाबत सर्व कंपनी प्रतिनिधींना सक्त सूचना देण्यात आल्या. कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी दिला.
खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यातील विविध बियाणे कंपन्यांच्या जिल्हा प्रतिनिधींची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 13 मे रोजी पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद बीडचे कृषी विकास अधिकारी श्री. एस. डी. गरांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व्ही. पी. भोसले तसेच विविध बियाणे कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
कृषी विभागाने शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नोंदणीकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, खरेदीची पक्की पावती घ्यावी व जतन करून ठेवावी, बियाण्याची बॅग सीलबंद असल्याची खात्री करावी तसेच टॅग, लॉट क्रमांक, उत्पादन दिनांक व वैधता कालावधी तपासावा, असे सांगण्यात आले.
तसेच बियाण्यावरील उगवण क्षमता, शुद्धता व उत्पादक कंपनीचे नाव तपासावे, एमआरपीपेक्षा जादा दर आकारला जात नाही ना याची खात्री करावी आणि कोणत्याही प्रकारचे बियाणे, खते किंवा कीटकनाशके सक्तीच्या लिंकिंगद्वारे घेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले.अनधिकृत विक्रेते, रस्त्याकडील विक्री किंवा संशयास्पद व्यवहारांपासून सावध राहण्याचा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करावी तसेच उगवण किंवा गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास तात्काळ संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
बियाण्यांच्या बॅग, पावती जतन करून ठेवा!
पिकांच्या नुकसानीसंदर्भात तक्रार करण्यासाठी वापरलेल्या बियाण्यांच्या रिकाम्या बॅगा व खरेदी पावत्या जतन करून ठेवाव्यात. तसेच शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणांचा आग्रह धरू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. बियाणे, खते, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना अडचणी आल्यास राज्यस्तरीय, विभागीय तसेच जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडेही तक्रार नोंदवता येणार आहे.