

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावात सुमारे बारा वर्षापुर्वी एका विवाह सोहळ्यात महिलांच्या पंगतीसाठी दुपार झाली होती. बच्चेकंपनी महिलां शिवाय भोजन करण्यास तयार नव्हती. मात्र पहिली पंगत पुरुषांची असल्याने कोणीही बोलण्यास तयार नव्हते. त्यानंतर गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन यापुढील विवाह सोहळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात पहिल्या पंगतीला महिलांचा मान असेल असे जाहिर करून टाकले त्यानंतर आज पर्यंत हि परंपरा कायम राहिली आहे. शुक्रवारी झालेल्या विवाह सोहळ्यात पहिल्या पंगतीचा मान महिलांनाच देण्यात आला.
औढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी हे आदिवासी बहुल गाव आहे. या गावात सुमारे बारा वर्षापुर्वी एका विवाह सोहळ्यास उशीर झाला. उन्हाळ्यात असलेल्या विवाह सोहळ्यास सुरुवातीला पुरुषांच्या भोजनाच्या पंगती उठल्या. मात्र दुपार झाल्यामुळे बच्चे कंपनी व इतर लहान मुले त्यांच्या कुटुंबातील महिलांसोबतच भोजन करण्याचा हट्ट धरून बसली होती. दुपारनंतरही महिलांच्या पंगतीसाठी हालचाली नसल्याने बच्चे कंपनीसह महिला देखील भुकेल्या होऊन भोजनाची वाट पहात थांबल्या होत्या.
दरम्यान, भोजनासाठी बच्चे कंपनी व महिला मंडळाची होणारी अडचण लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी तरुणांना एकत्र केले अन यापुढे गावातील विवाह सोहळा, धार्मिक कार्यक्रमात महिलांना पहिल्या पंगतीचा मान देण्याचा निर्णय बोलून दाखविला अन त्यानुसार तरुणांनी देखील त्यास सहमती दिली. त्यानंतर संपूर्ण गावानेच या उपक्रमाला पाठिंबा दिला अन त्यानंतर सर्वच कार्यक्रमांमधून भोजनासाठी महिलांची पहिली पंगत बसू लागली आहे.
अधिक मासाच्या एक महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी गावातील बुरकुले व रिठ्ठे परिवाराचा विवाह सोहळा होता. विवाह सोहळा थाटामात पार पडला अन भोजनाची पहिली पंगत महिलांचीच होती. एक तपानंतही महिलांना पहिल्या पंगतीमध्ये बसण्याचा मान कायम रहिला आहे. यावेळीही सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे, सरपंच संजय भुरके, भगवान रिठ्ठे, बबन रिठ्ठे, संभाजी डुकरे, नारायण रिठ्ठे, बबन मुकाडे, सचीन रिठ्ठे यांच्यासह गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.