

Passengers are fed up with dilapidated buses at Wasmat Agar
वसमत, पुढारी वृत्तसेवा : वसमत आगारातील भंगार बसेसमुळे प्रवाशांना अक्षरशः हाल सोसावे लागत आहेत. पावसाळ्यात बसमध्ये गळती होऊन प्रवाशांचे कपडे भिजतात, खिडक्या तुटलेल्या, कुशन फाटलेले, हॅण्डल तुटलेले, गुटखा खाऊन थुकलेले सफाई न केलेल्या अशा जुन्या व जीर्ण बसच प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याने प्रवासी वर्गाचा संताप वाढला आहे. चार पाच महिन्यांपूर्वी आगारास केवळ ५ नवीन आणि तीन दिवसांपूर्वी ५ अशा १० बस मिळाल्या असून, त्यामध्ये काही मार्गांचा भार हलका झाला. बाकीच्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या जुन्याच धावत आहेत.
तिकीट दर वाढले, पण सुविधा मात्र अद्याप शून्य आहेत. प्रवाशांना योग्य सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी आगार प्रमुखांनी ठोस पाठपुरावा करण्याची गरज आहे. मात्र, आतापर्यंत आगार प्रशासनाने समाधानकारक भूमिका घेतली नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे आगारातील कर्मचारीही आपली ड्युटी करून गप्प बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगतात नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने अशी माहिती दिली की वसमतला दुसऱ्या आगारातून डागडुजी, कलर करून ज्या गाड्या आल्यात त्यामध्ये प्रवासी संख्या वाढली तर गाडी एका साईडला हेलकावे मारत आहे.
यामुळे प्रवासी आणि आमच्या जीवाला धोका असूनसुद्धा आम्हाला नाईलाजास्तव या गाड्या रस्त्यावर चालवाव्या लागत आहेत. वसमत आगाराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर असून छत्रपती संभाजीनगर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, बार्शी, कल्याण, लातूर, शिर्डी, हैदराबाद याठिकाणी लांब पल्याच्या जवळपास २० फेऱ्या वसमत आगारातून होतात पण खटारा गाड्या असल्यामुळे अनेक ठिकाणी बस बंद पडत असल्याच्या माहिती दिवसेंदिवस मिळत असते. दररोज हजारो प्रवासी वसमत आगारातून बसेसद्वारे प्रवास करतात अशा परिस्थितीत प्रवाशांना दर्जेदार बस उपलब्ध करून देणे ही राज्य परिवहन विभागाची जबाबदारी आहे.
पण जुनी, जीर्ण आणि वारंवार बंद पडणारी वाहने अन्य आगारातून कलर करून वसमत आगारात आल्या असल्याने नवीन गाड्या वसमत आगाराला मिळाल्या नाही का ? असा प्रश्न निर्माण होत आहे, परभणी डिव्हिझनमधील प्रत्येक आगाराला ज्यात हिंगोलीला १९, कळमनुरीला ११, पाथरी, गंगाखेड, जिंतूर या आगारांना मानव विकास गाड्या सहित वसमतपेक्षा जास्त नवीन गाड्या मिळाल्याने वसमत आगार प्रमुखांनी वेळोवेळी पाठपुरावा केला नाही का असा सवाल प्रवाशी संघटना करत आहेत. वसमत आगारात प्रवाशांसाठी कोणती गाडी किती वाजता याची चौकशी करण्यासाठी फोन क्रमांक दिलेला आहे तो सध्या कंट्रोल रूम मध्ये उंदरांनी वायर कातरल्यामुळे आठ दिवसांपासून बंद पडलेला आहे.
हजारो प्रवासी वसमत बस्थानाकातून प्रवास करतात पण इतक्या मोठ्या स्थानाकात पिण्याच्या पाण्याची काही सुविधा नसल्याने प्रवाशांना पाण्याची बाटली विकत घेऊन पदरमोड करावी लागत आहे.
पूरपरिस्थिती निर्माण झाली. याचा फटका बसला अनेक ठिकाणी पुरामुळे बस अडकून पडल्या. पर्यायाने प्रवाशांना त्रास झाला. ही सर्व परिस्थिती आगारप्रमुखांनी हाताळणे अपेक्षित होते, परंतु राज्यभरातील ३४ आगारप्रमुखांनी कर्तव्याचे भान विसरून मुख्यालयी राहणे टाळले. आता या आगारप्रमुखांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाई केली जाणार आहे त्यात वसमत आगाराचाही समावेश असल्याचे कळत आहे.