

Vasmat Mategav Gram Sabha
आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील माटेगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थांच्या रोषामुळे आणि ग्रामसेवकांने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे गोंधळात विस्कळीत झाली. यामुळे गावातील पाणी, रस्ते, निधीचा वापर यांसारखे अनेक महत्वाचे प्रश्न पुन्हा एकदा प्रलंबित राहिले आहेत.
ठरलेल्या वेळेत आणि हट्ट पोलीस स्टेशनच्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या ग्रामसभेत सुरुवातीला सरपंचांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यानंतर ग्रामस्थांनी गावातील विकासकामांबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
पिण्याच्या पाण्याची अनियमितता, 15 व्या वित्त आयोगाचा निधी कुठे खर्च झाला, घरकुल लाभार्थी यादीत गैरप्रकार, तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी जाब विचारला. मात्र, ग्रामसेवकांनी याबाबत कोणतेही लेखी कागदपत्र किंवा समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी "उत्तरे द्या नाहीतर सभा बंद करा" अशा घोषणा दिल्या. काही वेळातच सभेत गदारोळ वाढल्याने सरपंचांना सभा तहकूब करण्याची घोषणा करावी लागली.
"ग्रामसभा ही गावातील सर्वोच्च संस्था आहे. मात्र अधिकारी केवळ औपचारिकता म्हणून सभा घेतात. आमच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. जोपर्यंत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
ग्रामसभा कलम 243-अ नुसार गावाच्या विकासाचा आराखडा ठरवणारी सर्वात महत्वाची सभा मानली जाते. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ती केवळ नावापुरती राहत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामसभेच्या गोंधळामुळे माटेगाव गावातील अनेक विकासकामे आता रखडण्याची शक्यता आहे.