

Vasmat Taluka Injangaon Land Dispute
वसमत : तालुक्यातील ईंजनगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादग्रस्त जागेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या वतीने संबंधित जागेवर भगवा झेंडा उभारून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात मातंग समाजातील महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजबांधवांनी एकत्र येत जयंती साजरी केली.
घटनेची माहिती मिळताच वसमत पोलिसांसह तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.
तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे तणाव कमी झाला असून सध्या गावातील परिस्थिती शांत आणि नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परिसरावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, ईंजनगावातील संबंधित जागेचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या प्रश्नावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.