

हिंगोली : मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे येथील मोंढ्यात विक्रीसाठी आणलेली अनेक शेतकऱ्यांची हळद भिजली. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आपली हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होत आहे. हळद घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. मार्केट यार्डात शेड आहेत परंतू ते बंदिस्त नाहीत. काही शेतकऱ्यांची हळद शेडच्या बाहेर पडत आहे. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास सुसाट्याचा वारा सुटला आणि काही काळ पावसाच्या सरी कोसळल्या.
अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजली. काही शेतकऱ्यांनी धावपळ करत बाजारातून मेनकापड विकत घेऊन हळद झाकण्याचा प्रयत्न केला. परंतू, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने मेनकापड देखील झाकता आले नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत लाखमोलाची हळद पावसाने भिजली. भिजलेल्या हळदीला दर मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात दरवर्षी हजारो क्विंटल मालाची खरेदी-विक्री होते. यातून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळते. परंतु, शेतकऱ्यांचा माल पावसापासून भिजू नये यासाठी बाजार समितीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. परंतु, बाजार समिती प्रशासन मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे मंगळवारी अनेक शेतकऱ्यांची हळद पावसात भिजली. या नुकसानीला बाजार समिती जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.