

Health institutions should complete their work on time District Collector
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त करण्यासाठी निर्धारित निकष व निर्देशांकानुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता, स्वच्छता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात. यामधील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना नियमित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा, उपलब्ध आरोग्य सुविधांचा तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, संबंधित अधिकारी व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य संस्थांमध्ये अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून कर्तव्य बजावावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल यांनी दिले.
बैठकीत बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत कार्ड, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता, वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि कार्यस्थिती यासह आरोग्य विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.