

Hingoli Rain: Farmers distressed by the absence of rain
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी नदी, नाले व तलाव कोरडे ठाक पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
यंदा चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बँक कर्ज, सावकारी आणि घरातील दागदागिने गहाण मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न अन् कर्जाची परतफेड यांसारखी स्वप्ने त्यांनी बाळगली होती. मात्र, पावसाच्या हुलकावणीने सर्व आशांवर पाणी फिरले आहे. सध्या शेतातील कापूस, सोयाबीन, तूर व बाजरी ही पिके पाण्याच्या अभावामुळे पिवळी पडू लागली आहेत. जमिनीत ओलावा नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना महागड्या औषध फवारणीचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. आभाळात ढंग दाटून येतात, पण पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.
मागील दोन दिवसांपुर्वी थोड्या प्रमाणात पाऊस झाला. मात्र या पावसाने थोड्याफार प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी दमदार पाऊस केव्हा पडतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होईल. विहिरींचे पाणी आटल्याने फळबागा जगवणे देखील शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, अनेक भागांत सोयाबीन, कापूस व तूर या पिकांची पाने पिवळी पडू लागली.
मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके जगविण्याचे आव्हान उमे राहिले आहे. पिके वाचविण्यासाठी पाणी द्यावे लागत असून फवारणीचाही अतिरिक्त बोजा पडत आहे. येत्या आठ दिवसात दमदार पाऊस न झाल्यास खरीपाची पिके संकटात येतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.