हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकर्यांना पाणंद रस्ता मंजूर असतानाही त्या रस्त्याचे काम राजकीय दबावापोटी बंद पाडले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतात जाण्यासह विद्यार्थ्यांना शाळेत भांडेगाव येथे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एक तर संबंधित विभागाला सुचना देऊन रस्ता करावा अन्यथा शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केल्याने चक्क जिल्हाधिकारी अवाक् झाले.
गुरूवारी कलगाव येथील ३० ते ४० शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन आपली कैफीयत प्रशासनाच्या कानावर घातली. कलगाव ते भांडेगाव हा ४ किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे. या रस्त्याला क्रमांक देखील मिळाला असून रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळाली आहे. ९० टक्के शेतकर्यांची पाणंद रस्त्याला संमती असतानादेखील राजकीय लोकांच्या दबावापोटी व द्वेषापोटी रस्त्याचे काम बंद पाडल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. कलगाव येथील शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकर्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
शेतात जावे कसे, काम करावे कसे व पिक कसे जोपासावे असा प्रश्न येथील शेतकर्यांना पडला आहे. विशेष म्हणजे कलगाव येथून आठवी पासून बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी भांडेगाव येथे जावे लागते. परंतु, भांडेगावला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे. कलगाव येथील नागरिकांना आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी भांडेगाव येथेच जावे लागते. त्यामुळे कलगावच्या ग्रामस्थांना पावसाळ्यात प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या बाबींचा विचार करून संबंधित विभागाला सांगून रस्त्याचे काम करावे ते शक्य न झाल्यास शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी अन्यथा शेतकऱ्यांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकर्यांकडून चक्क हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. निवेदनावर विकास पौळ, सोपान पौळ, अनिल पौळ, भाऊराव पौळ यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू आहे. परंतु, कलगाव येथील अनेक शेतकर्यांना पेरणीसाठी डोक्यावर बियाणे, खत तसेच औत न्यावे लागले. पेरणीसाठी या भागातील शेतकर्यांना प्रचंड कष्ट सोसावे लागले. परंतु प्रशासनाला मात्र या गंभीर बाबींचे सोयरसुतक नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे यांनी केला आहे.