

हिंगोली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांच्या संदर्भात काँग््रेास पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 9 मार्च रोजी कळमनुरी येथील लमाणदेव येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेचा समारोप हिंगोली येथील गांधी चौक परिसरात सभेमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सचिन नाईक यांनी दिली.
मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेतकरी बांधवांवर अन्याय होणार असून सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, डेअरी प्रॉडक्ट, लघुउद्योग यांचे भाव कोसळणार आहेत. त्यामुळे अमेरिकेसोबत केलेला करार रद्द करण्यात यावा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर पडलेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये पाणंद रस्ते, सिंचन विहिरी, गोठे व इतर रोजगार हमी योजनेची कामे राज्यात थांबविण्यात आलेले आहेत, त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व योजना चालू ठेवण्यात याव्यात. कयाधू नदीचे पाणी वळवून इसापूर धरणामध्ये सोडण्यात येणार आहे, यामुळे कयाधू नदीकाठच्या गावांना तीव पाण्याची टंचाई भासणार आहे.
त्यामुळे कयाधू नदीचे पाणी वळविण्याचा हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. कळमनुरी तालुक्यातील रामवाडी मुंडळ उपसा जलसिंचन योजनेला तात्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे, पीकविमा सरसकट शेतकरी बांधवांना देण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी कळमनुरी येथून पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सचिन नाईक, सुरेशअप्पा सराफ, डॉ. रमेश शिंदे, मिलिंद उबाळे, एकनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.