Hingoli crime : कत्तलखान्यात जाण्यापूर्वीच 5 जनावरे ताब्यात
आखाडा बाळापूर : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथून जवळा पांचाळ येथे कत्तलखान्यात नेली जाणारी पाच जनावरे आखाडा बाळापूर पोलिसांनी पकडली. या प्रकरणी एका तरुणाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर जनावरे गोशाळेत सोडण्यात आली.
वसमत तालुक्यातील कुरुंदा भागातून एका पिकअप वाहनामध्ये पाच गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून जवळा पांचाळकडे कत्तलखान्यात नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने कुरूंदा ते जवळापांचाळ मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली होती.
यावेळी एक पिकअप वाहन जवळापांचाळ शिवारात आले असतांना पोलिसांनी सदर वाहन थांबवून चालक शेख अय्याज शेख हबीब (रा. कुरुंदा) याच्याकडे चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच त्याचा समाधानकारक उत्तरे देता आली नाही. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात पाच गोवंशीय जनावरे आढळून आली.
याबाबत विचारणा केली असता चालक शेख अय्याज याने जनावरे नातेवाईकांकडे नेत असल्याचे सांगितले. मात्र या जनावरांचा दाखला तसेच वाहतूक परवाना त्याच्याकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी पिकअप वाहन व पाच जनावरे असा 4.70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी जमादार जाधव यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संतोष नागरगोजे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी सदर जनावरे तोंडापूर येथील गोशाळेत सोडण्यात आले.

