

Banana crops suffer heavy damage due to rain in Kalamnuri and Basmat taluka
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे चांगली दाणादाण उडाली असून कळमनुरी व वसमत तालुक्यातील अनेक भागांमध्ये केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तर हिंगोली तालुक्यातील पहेणी गावामध्ये ७० ते ८० घरावरील टीन पत्रे उडून गेल्यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे.
शहरासह जिल्ह्यात शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. जिल्ह्यात सुमारे एक ते दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील दिग्रस, दांडेगाव, सालापूर, डोंगरकडा या परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. केळीचे घड खाली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
याशिवाय वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. बागलपार्डी व इतर ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. केळीच्या बागात घड खाली पडले. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे सुमारे ७० ते ८० घरावरील टीन पत्रे उडून गेली.
यामुळे शेतकऱ्यांची तसेच गावकऱ्यांची चांगली धावपळ झाली. पेरणीसाठी आणून ठेवलेली बियाणे व खते या पावसामुळे भिजल्याने मोठे नुकसान झाले. याशिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पावसाचे पाणी थेट घरात आल्यामुळे संसार उपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. पाऊस थांबल्यानंतर पत्रे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची चांगली धावपळ झाली होती.
पहिल्याच मोठ्या पावसामुळे जिल्ह्यात चांगली दाणादाण उडाली आहे. याशिवाय हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर झाड तुटून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. दुपारी खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरा सुरळीत झाला.