

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथे काही समाजकंटकांनी बौद्ध वस्तीवर हल्ला करून या प्रकरणात काही निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, आरोपींची नावे कमी करण्यात यावीत, कलम वाढ करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शेनोडी प्रकरणात देण्यात आलेल्या निवेदनानुसार बौद्ध वस्तीवर गावातील काही लोकांनी 28 जानेवारी रोजी हल्ला केला होता. यामध्ये 7 ते 8 जणांना गंभीर मारहाण करण्यात आली. याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याखाली दाखल झालेला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील काही लोकांनी संगणमत करून बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यात सरकारी नोकरीला लागलेल्या तरुणांना सुद्धा गोवण्यात आले आहे.
याबाबत रिपब्लिकन सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांची भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये निरपराध तरुणांचे नावे प्रथम खबरी अहवालातून कमी करण्यात यावेत, ॲट्रॉसिटीखाली दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, गुन्ह्यांमध्ये बौद्ध तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे कलम वाढ करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विधी आघाडीचे ॲड. रावण धाबे, जिल्हाध्यक्ष ॲड. अभिजीत खंदारे, युवक आघाडीचे विकी काशीदे, मुनीर सय्यद, यशवंत साळवे, प्रबुद्ध पाईकराव, चेतन खंदारे, सुमेध पंडित आणि शेनोडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.