अजिंठा ; पुढारी वृत्तसेवा सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी परिसरातील शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात ठिबकवर कपाशीची लागवड केली. रोपे उगवली, मात्र मुळांवर बुरशी आणि मर रोग पडू लागला. यामुळे आज एक रोप सुकते दुसऱ्या दिवशी प्रमाण वाढते, तिसऱ्या दिवशी शेकडो रोपे जळत असल्याने तब्बल दीड महिन्याचे कपाशीचे पीक त्यांना उपटावे लागले. मुळांवर आणि खोडाला बुरशीचा प्रादुर्भाव, तर पाने लाल पडू लागली होती. हा प्रादूर्भाव अधिक पसरल्याने दुसऱ्यांदा मकापेरणी करायची झाल्यास, शासनानेच अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. सध्या राज्यातील सत्तासंघर्षांचे चित्र पाहता, ही आशा देखील नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या वर्षी शासनाने मे महिन्यामध्ये कपाशीची लागवड करू नये, असे आवाहन केले होते. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केली. पिंपळदरी येथील शेतकरी राजधर केशव गव्हाणे यांनी दोन एकरातील कापूस रोपे उपटून फेकली आहेत. बियाणे आणि खते यांचा खर्च वाया गेला आहे. हीच परिस्थिती परिसरातील आशोक विनायकराव गव्हाणे या शेतकऱ्यांची झाली आहे. कापसावर मर रोगासह बुरशीचा प्रादुर्भावाने पाने लाल पडली. ठिबक सिंचनाने कपाशीला वेळेवर आणि पुरेसे पाणी दिले जात होते. पिका चांगले होते. महिना झाल्यानंतर पाने लाल पडून जळत असल्याने औषध मारले, तरी फरक पडला नाही. कपाशाची अधिकच नाजूक अवस्था होत चालली होती.
त्यामुळे त्यांनी दीड एकर कापुस पीक उपटून फेकल्याने बियाणे, लावणी, मशागत, खते किटकनाशके, मजूरी यावर मोठा खर्च झालेला आहे. ते कापूस उपटताना अनावर झाले होते. पंचनामा करुन शासनानेच आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
" पुरेसे अन्नद्रव्य घटक मिळाले नसल्याने कपाशीचे नुकसान झाले असावे, असा अंदाज चर्चिला जात आहे.
१) राजधर केशव गव्हाणे शेतकरी गट क्र १६० मध्ये मी मान्सूनपूर्व दोन एकर कपाशीची लागवड केली होती. एक महिना झाले. माझ्या शेतातील कपाशीचे पिके लाल पडून खराब होत असल्याने मी कपाशी पीक उपटून मक्का लावणीचा निर्णय घेतल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
(२)अशोक विनायकराव गव्हाणे (गट क्र १६० ) मधील दीड एकर मान्सूनपूर्वी कपाशी पिकाची लागवड केली आहे. मात्र, माझ्या शेतीमधील कापसाचे झाडे भरपूर लाल होऊन खराब होत जळून जात. पिक पूर्णता नष्ट झाल्याने मी हे पिक उपटून टाकण्याचा निर्णय घेतला व त्या ऐवजी मका लागवड करणार आहे. यामुळे मला दुबार पेरणी करावी लागणार आहे. झालेल्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
हेही वाचा :