

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर ते कमान वेस या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या रुंदीकरणासाठी 1988-89 दरम्यान व्यापारी व रहिवाशांकडून 7 ते 17 फूटपर्यंत जागा संपादित करण्यात आली होती. मात्र, जवळपास तीन दशकांनंतरही या जागेचा मोबदला (मावेजा) न मिळाल्याने संबंधितांमध्ये तीव्र नाराजी असून नव्या विकास आराखड्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तत्कालीन आमदार माणिकराव खपले यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता रुंद करण्यात आला होता. मंदिर महाद्वार ते कमान वेस हा मार्ग धाराशिव रोडला जोडणारा असल्याने परिसरातील जागा अत्यंत मौल्यवान मानली जाते. अनेक व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत जागा दिली; मात्र त्यांना आजपर्यंत योग्य मोबदला मिळालेला नाही.
या प्रकरणी काहींनी धाराशिव जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या असून प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.2003 मध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांतर्गत रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; परंतु त्यास यश आले नाही. तसेच किसान चौकी ते अग्रवाल भवन या मार्गाचे कामही प्रलंबितच राहिले.
दरम्यान, मंदिर परिसरात विविध भक्तनिवास उभारण्यात आले असले तरी त्यांच्या व्यवस्थापनाबाबत प्रशासनावर टीका होत आहे.सध्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकाळात 1865 कोटी रुपयांचा विकास आराखडा समोर आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते व अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नगरपरिषदेकडून नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी मोबदला न मिळालेल्या जागांवर कारवाई होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
बाजारभावाने हवा मोबदला
आमच्या जागेचा मोबदला आजच्या बाजारभावाने द्यावा,” अशी मागणी व्यापारी बालाजी भालेकर यांनी केली आहे. तसेच, न्यायप्रविष्ट प्रकरणे तातडीने निकाली काढून प्रशासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. विकास कामे करताना स्थानिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक असून अन्यथा असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.