

धाराशिव/भूम : भूम शहरातील गोलाई चौकात झेंडा लावण्याच्या वादातून झालेल्या दगडफेकीत चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूकडील जवळपास 61 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
मागील दोन महिन्यांपासून महापुरुषांचे पुतळे उभारण्यावरून दोन गटांत हा वाद सुरू होता. त्यानंतर प्रशासनाने तोडगा काढत दोन्ही पुतळे वेगवेगळ्या जागेत बसवून सामोपचाराने हा वाद मिटवला होता. शुक्रवारी (दि. 15) रात्री हा वाद एक झेंडा पुन्हा उभारल्याने नव्याने पेटला. त्यातूनच हा प्रकार झाला.
गोलालाई चौकात एका गटाने झेंडा लावल्याची माहिती समजल्यानंतर दुसरा गटही तिथे पोहोचला. त्यांनीही तिथे झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पहिल्या गटातील तरुणांनी विरोध केला. या वेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही बाजूकडील तरुणांना समजून सांगत हा वाद कायदेशीर मार्गाने मिटविण्याचे आवाहन केले.
त्यानंतर काही वेळातच दगडफेकीला सुरुवात झाली. त्यात दोन फौजदारांसह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान या दगडफेकीमुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी शनिवारी दोन्ही बाजूकडील सशयितांची धरपकड मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत ती सुरूच होती.
या प्रकरणी फौजदार प्रल्हाद सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडील 150 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात 61 जणांची नावे निष्पण्ण झाली आहेत. त्यानुसार विठ्ठल अण्णा बाराते, दत्ता गाढवे, अवधूत गाढवे, अनिकेत महाडिक, रोहित टिपे, अक्की ऊर्फ अक्षय गायकवाड, संदीप सरवदे, रत्नदीप सरवदे, सचिन अशोक शिंदे, शाक्य शिंदे आदी 61 जणांची ओळख पटल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.