

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) नेमलेल्या एसआयटीमधील बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी हटवावेत. व त्या बदल्यात अन्य जिल्ह्यातील अधिकारी नेमावेत, अशी मागणी प्रमुख वक्त्यांनी आज (दि.११) येथे केली. संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सर्व समाज बांधव व सर्व पक्ष संघटनांतर्फे धाराशिव येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Dharashiv Protest)
दुपारी बारा वाजता बार्शी नाका येथील जिजाऊ चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तिथे आल्यानंतर प्रमुख वक्त्यांनी भाषणे केली. यात सर्वांनीच तपास संस्थेबाबत भाष्य करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. (Santosh Deshmukh Murder Case)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह आ. राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रवीण स्वामी, खा. बजरंग सोनवणे आदी नेते विविध पक्ष, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. (Santosh Deshmukh Murder Case)
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रमुख नेत्यांनी केली. ज्याप्रमाणे देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्यावरही तो गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. धस व जरांगे यांनी केली. ही मागणी पूर्ण नाही केली. तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. (Santosh Deshmukh Murder Case)
जरांगे म्हणाले की, देशमुख प्रकरणातील तपासासाठी नेमलेल्या एसआयटीमध्ये दहा पैकी नऊ सदस्य बीड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास संशयास्पद असेल. ही शंका दूर करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीमध्ये बीड वगळून अन्य जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा. (Santosh Deshmukh Murder Case)
आ. धस म्हणाले की, केवळ दीड कोटी रुपयांसाठी आरोपीने देशमुख यांची हत्या केली आहे. त्यांनी मागितले असते तर दीड कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रातून जमा करून त्यांना दिले असते. पण इतकी क्रूर हत्या करण्याचे काहीच कारण नव्हते. देशमुख व परभणी येथील सूर्यवंशी यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पाठीशी न घालता सरकारने मास्टरमाइंडचा शोध घेऊन सर्वांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा हे आंदोलन यापुढेही तीव्र केले जाईल.
मोर्चासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक आले होते. दुपारी तीन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. तिथे सर्वांची भाषणे झाली. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. एसटीची वाहतूकही काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका प्रवाशांना बसला. (Santosh Deshmukh Murder Case)