

लातूर : नीट परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले. पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी करत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या मार्चचे नेतृत्व लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना मांडत प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली उद्योग भवन परिसरातील ट्यूशन एरियामधील श्री अष्टविनायक मंदिरापासून सायंकाळी साडेसहा वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. अष्टविनायक मंदिर, नंदी स्टॉप मार्गे हा मार्च क्रीडा संकुलापर्यंत पोहोचला.. या मार्चमध्ये हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी सामील झाले होते.
राजीनामा द्या राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, मोदी सरकार विक हे, इसिलीए पेपर लिक है, जब मोदी सरकार डरती है तब पोलिस को आगे करती है, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय…..अशा अनेक घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यांच्या हातातील फलकांवरून त्यांच्या मनात असलेला सरकार व व्यवस्थेबद्दलाचा संताप बोलका होत होता. अनेकांच्या हातात तिरंगा होता.
या मोर्चामुळे औसा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. क्री़डा संकुलातील शहीद स्मारकासमोर या कॅन्डल मार्चचे सभेत रूपांतर झाले. सभेस आमदार अमित देशमुख , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी संबोधीत केले. तत्तपूर्वी काही विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.